Wednesday, December 31, 2014

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (Establishment of British rule in India)


 बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा उदय:
१. भारतात इंग्रजांचे बस्तान
२. प्लासीची लढाई
३. मीर कासीमशी तह
४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व

  १. भारतात इंग्रजांचे बस्तान:
  • व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज आणि डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. 
  • इंग्रजांची पहिली वखार मुगल सम्राट जहांगीर च्या कारकीर्दीत पश्चिम किनार्‍यावर सुरत येथे स्थापन झाली.
  • बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार १६५१ मध्ये हुगळी येथे निघाली. त्यासाठी बंगालचा तत्कालीन सुभेदार शाहशुजा ह्याने इंग्रजांना परवानगी दिली.
  • त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन ह्याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशुजाने इंग्रजांना वार्षिक रु. ३०००/- च्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल, बिहार आणि ओरिसात  मुक्त व्यापाराची परवानगी दिली. 
 २. प्लासीची लढाई:
  • १७५६ मध्ये सिराजउदौला बंगालचा नबाब बनला. ह्याच सुमारास फ्रेंचांशी युद्ध सुरु होण्याची परिस्थिती दिसू लागल्याने   इंग्रजांनी फोर्ट विलियम लढण्यासाठी सज्ज केला व पराकोटावर तोफा चढविल्या.  ह्याबद्दल सिराजउद्दौलाने जाब विचारला असता इंग्रजांनी टाळाटाळीचे उत्तर दिले. त्यामुळे सिराजउदौलाने इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरु केली आणि फोर्ट विलियमवर हल्ला चढविला. ५ दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करली आणि कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे नबाब राजधानी मुर्शिदाबाद येथे निघून गेला.
  • कलकत्ता सिराजउदौलाच्या हाती पडल्याची बातमी मद्रासला पोहोचताच  तेथील अधिका-यांनी तेथील एक सैन्य क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याला पाठवले. हे सैन्य कलकत्त्याला जाताच (डिसेंबर १७५६) माणिकचंदने लाच घेऊन कलकत्त्याचा ताबा इंग्रजांना दिला. 
  • ह्यानंतर सिराजउदौला आणि क्लाइव्ह ह्यांच्यात कलकत्ता येथे एक तह झाला. त्यानुसार इंग्रजांना व्यापारातील जुन्या सवलती पुन्हा मिळाल्या तसेच कलकत्त्याची लष्करी सिद्धता करण्याची अनुमती मिळाली. इंग्रजांचे झालेले नुकसान भरून देण्याचे नबाबाने कबूल केले. परंतु इंग्रज आता आक्रमक भूमिकेत होते. तसेच नबाबाचे काही अधिकारी त्याच्यावर नाराज होते. संधीचा फायदा घेत क्लाइव्हने कारस्थान रचले. त्यात नबाबाचा मुख्य सेनापती मीर जाफर इ. सहभागी झाले. कारस्थान असे ठरले कि मीर जाफरला नबाब बनवले जाईल आणि त्याऐवजी तो कंपनीच्या उपकाराची परतफेड करेल.
  • मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी फ्रेंच वसाहत चंद्रनगर जिंकून घेतले. त्यामुळे नबाब संतापला. पण तो अडचणीत होता कारण त्याला अफगानांकडून व मराठ्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाटत होती. नेमक्या अशावेळी क्लाइव्ह आपल्या सैन्यासह मुर्शिदाबादकडे निघाला. 
  • इंग्रज सैन्य आणि नबाब सिराजउदौलाचे सैन्य २३ जून १७५७ रोजी मुर्शिदाबादच्या दक्षिणेला २२ मैलांवर असलेल्या प्लासी गावात एकमेकांसमोर आले. इंग्रज सैन्यात ९५० युरोपियन पायदळ, १०० युरोपियन तोफ, ५० इंग्रज नाविक आणि २१०० भारतीय सैनिक होते. 
  • लढाई चालू असताना मीर जाफरने नबाबला सल्ला दिला कि त्याने युद्धकार्य  अधिका-यांकडे सोपवावे आणि स्वतः युद्धभूमी सोडून निघून जावे. त्याप्रमाणे नबाब २००० सैन्य घेऊन मुर्शिदाबादकडे निघून गेला. नबाबाकडील फ्रेंच सेनाही लवकर पराभूत झाली. मीर जाफर सर्व लढाई तटस्थपने बघत राहिला. क्लाइव्हच्या विजयाबद्दल मीर जाफरने त्याचे अभिनंदन केले.
  • लवकरच नबाब सिराजउदौला याला पकडून ठार मारण्यात आले आणि मीर जाफरला बंगालचा नबाब म्हणून घोषित करण्यात आले.
  • इंग्रजांच्या मदतीबद्दल मीर जाफरने कंपनीला २४ परगणे जिल्ह्याचा प्रदेश दिला. स्वतः क्लाइव्हला २,३४,००० पौन्ड्स भेट देण्यात आली आणि इतरांना रु. ५० लक्ष बक्षीस देण्यात आले. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांना देण्यात आल्या. तसेच कोणताही इंग्रजांकडून नबाब घेणार नाही असे ठरले.
 प्लासीच्या लढाईचे महत्व :
  • लष्करी दृष्टीने पाहता प्लासीची लढाई फारशी महत्वाची नव्हती. इंग्रजांनी खास लष्करी डावपेचाचे किंवा चातुर्याचे प्रदर्शन केले नाही. नबाबाच्या सहकार्यांनी त्याचा विश्वासघात केला. 
  • प्लासीच्या लढाईचे खरे महत्व त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमांमुळे आहे. बंगाल इंग्रज नियंत्रणाखाली आला. नवीन नबाब मीर जाफर आपले पद आणि संरक्षण ह्यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून राहिला. हळूहळू बंगालची सर्व सत्ता कंपनीकडे आली.प्लासीच्या लढाईने विशेषतः त्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या केलेल्या लुटीमुळे इंग्रज अपरिमित साधनसंपत्तीचे स्वामी बनले. कंपनीच्या स्थितीचाही कायापालट झाला. इंग्रजांनी हि लढाई जवळ जवळ न लढतच जिंकली. भारतावर अधिकार मिळवण्याच्या साखळीतील हि महत्वाची कडी होती. 
 ३. मीर कासीमशी तह:  

  • मीर जाफरविरुद्ध निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा अचूक फायदा मीर जाफरचा धूर्त जावई मीर कासीम ह्याने घेऊन स्वतःला इंग्रजांचा मित्र व नबाबाचा प्रतिस्पर्धी जाहीर केले. इंग्रजांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचेही त्याने आश्वासन दिले. त्यादृष्टीने इंग्रज व मीर कासीममध्ये खालील तह झाला.
    •  मीर कासीमने कंपनीला बरद्वान, मिदनापूर व चितगाव जिल्हे द्यावे.
    • सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीची अर्धी भागीदारी राहील.
    • मीर कासीम कंपनीला दक्षिण मोहिमांसाठी रु. ५ लक्ष देईल.
    • कंपनीचे शत्रुमित्र मीर कासीम आपले शत्रुमित्र मानील.
    • एकमेकांच्या प्रदेशातील लोकांना रहिवासाची संमती देण्यात येणार नाही.
    • कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल. परंतु अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
  • तहाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी मुर्शिदाबादला गेले. एकून परिस्थिती आपल्याविरुद्ध गेल्याची पाहून मीर जाफरने सत्तात्याग केला. त्यानंतर मीर जाफरने कलकत्ता येथे राहणे पसंद केले. त्याला रु. १५,०००/- मासिक पेन्शन देण्याचे ठरले. 
 ४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व:
  • कालांतराने मीर कासीम हि इंग्रजांच्या हातातील खेळणे बनले. व्यापारीवृत्तीच्या इंग्रजांनी अखेर मीर कासिम्ला संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. 
  • प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब मीर कासिमाला नबाब पदावरून हटवून मीर जाफरला पुन्हा बंगालच्या नबाबपदावर बसवण्यात आले. मात्र संघर्ष सुरूच राहिला. हळूहळू मीर कासीमची ताकद कमी पडू लागली. म्हणून तो सीमेवरील अवध राज्यात निघून गेला. ह्यावेळी अवधाचा नबाब शुजा उद्दौला होता. पानिपतच्या युद्धाच्या वेळी दिल्लीहून पळालेला मुगल सम्राट शाह आलम अवधच्याच आश्रयाला होता. इंग्रजांना बाहेर काढण्याबाबत वरील तिघांचे संगनमत होऊन त्यांनी एक संयुक्त फळी तयार केली. त्यात सुमारे ५०,००० च्या आसपास सैनिक होते. 
  • ह्या सैन्याचा मुकाबला कंपनीबरोबर बक्सार येथे झाला. इंग्रज सैन्यात ७०२७ सैनिक असून त्याचे नेतृत्व मेजर मनरोकडे होते.
  • २३ ऑक्टोबर १७६४ रोजी झालेल्या बक्साराच्या लढाईत उभयपक्षी हानी झाली. मात्र विजय इंग्रजांना मिळाला. लढाईत इंग्रजांकडील ८४७ सैनिक जखमी किंवा मृतुमुखी पडले. 
  • प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे प्लासीची लढाई इंग्रजांनी विश्वासघाताच्या मार्गाने जिंकली होती. मात्र बक्सारची लढाई इंग्रजांनी स्वतःच्या युद्धकौशल्यावर जिंकली. 
  • प्लासीच्या निर्णयावर बक्साराच्या विजयाने शिक्कामोर्तब केले. भारतात आता इंग्रजांना आव्हान देणारे दुसरे कोणी राहिले नाही. बंगालचा नबाब इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. अवधाचा नबाब शुजा उदौला आणि देल्ली सम्राट शाह आलम इंग्रजांना शरण आले. इंग्रजांचे क्षेत्र पश्चिमेला अलाहाबाद्पर्यंत वाढले आणि त्यामुळे दिल्लीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 
  • प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्ता दृढमूल झाली तर बक्सारच्या लढाईने उत्तर भारतात ती बलशाली बनली. भारत गुलामगिरीत जाणार हे स्पष्ट दिसत होते. बक्सारची लढाई भारताच्या इतिहासात निर्णायक ठरली होती.

1 comment: