Sunday, January 4, 2015

आर्य समाज:

 सं स्था प क - आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हें काठेवाडांतील मोरवी संस्थानातल्या एका खेडयांत १८२४ सालीं जन्मले. त्यांनीं आपल्या हयातींत आपलें मूळ नांव किंवा जन्मस्थान कधीहि कोणास सांगितलें नाहीं; व याचें कारण, अंगीकारलेल्या धर्मकार्यांत नातेवाईक येऊन अडथळा करतील किंवा मरणोत्तर समाजाचा अधिपति म्हणून कोणी आपला नातेवाईक वारसा हक्क सांगू लागेल, असें स्वामी सांगत असत. तथापि १८८३ मध्यें स्वामी परलोकवासी झाल्यावर त्यांचें खरें नांव मूलशंकर अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर हे ब्राह्मण जातीचे शैवपंथी सुखवस्तु गृहस्थ असून त्यांचा धंदा पेढीवाल्याचा होता. मूलशंकर उर्फ स्वामी दयानंदसरस्वती यांच्या आयुष्याचे तीन विभाग पडतात. पहिला. पूर्व वय (१८२४-१८४५), दुसरा प्रवास व अध्ययन (१८४५-१८६३), तिसरा सार्वजनिक कार्य (१८६३-१८८३). आयुष्यांतील पहिल्या दोन विभागांची माहिती स्वामींनीं स्वतः लिहून ठेवलेल्या आत्मचरित्रावरून चांगली मिळते. आर्यसमाजाच्या या संस्थापकाच्या धर्मबुध्दीसंबंधानें त्याच्या पूर्व वयांत तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. पहिली चवदाव्या वर्षीच मूर्तिपूजेविरुध्द केलेले बंड. त्याचें कारण शैव संप्रदायानुसार एका शिवरात्रीच्या दिवशीं उपोषण करून रात्री शिवालयांत भजन पूजन व जाग्रण करीत असतां त्यांनीं शिवाच्या मूर्तीवर एक उंदीर इकडे तिकडे बागडतांनां व नैवेद्य खातांनां पाहिला. दुसरी गोष्ट संसारत्याग करून मोक्ष मिळवण्याचा त्यानें केलेला निश्चय; याचें कारण बहिणीच्या मृत्यूमुळें त्यांनां झालेलें अपरंपार दुःख. तिसरी गोष्ट एकविसाव्या वर्षी त्यांनीं केलेला गृहत्याग. याचें कारण त्यांच्या आईबापांनीं जुळवून आणलेला विवाह टाळण्याची त्यांची इच्छा. याप्रमाणें मूर्तिपूजेविरुध्द बंड, मोक्ष मिळवण्याचा निश्चय, आणि संसारत्याग या तीन गोष्टींनीं स्वामींच्या भावी आयुष्याचा पाया घातला गेला या पूर्व इतिहासाबद्दल कोणास शंका येण्याचें कारण नाहीं. कारण स्वामीचें मूर्तिपूजेविरुध्द मत अखेरपर्यंत कायम होतें, आणि मूर्तिपूजेविरुध्द चळवळ स्वामींनी हरिद्वार काशी, इत्यादि प्रमुख क्षेत्रीं केली. संसाराबद्दलच्या त्यांच्या विरक्तीबद्दलहि कोणास संशय घेण्याचें कारण नाहीं. कारण स्वामींनीं एकदां जें घर सोडलें तें आप्तेष्टांचें दर्शन घेण्यास सर्व हयातींत एकदांहि ते गृहाकडे गेले नव्हते.
घर सोडल्यानंतर अठरा वर्षे स्वामीनीं संन्याशी होऊन प्रवास करण्यांत व निरनिराळया गुरूंपासून ज्ञान संपादण्यांत घालविलीं, त्यांत प्रथमपासूनच त्यांच्या मनावर वेदग्रंथांचा फार परिणाम झाला व व्यक्तिगत आत्मा आणि परत्मात्मा एकच असल्याबद्दल त्यांची खात्री पटली. ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन त्यांचें नांव शुध्दचैतन्य असें ठेवण्यांत आलें. पुढें चवथ्या संन्यासाश्रमाची दीक्षा देऊन त्यांनां दयानंद सरस्वती हें नांव देण्यांत आलें. तथापि पुढें लवकरच स्वामी वेदांतमार्ग सोडून योगमार्गाकडे वळले; आणि त्यानंतर स्वामींच्या चरित्रावर अखेरचा धार्मिक परिणाम मथुरा येथें रहाणाऱ्या स्वामी विरजानंद सरस्वती नांवाच्या एका अंध वैदिक विद्वानाचा झाला. हा वैदिक अलीकडील संस्कृत वाङ्मयाचा पक्का द्वेष्टा होता. त्यानें वेद शिकविण्यास आरंभ करण्यापूर्वी सर्व अलीकडील संस्कृत ग्रंथ फेंकून देण्यास सांगितलें व दयानंदांनीं तसें केल्यावर त्यांनां वेद शिकवले. वेदाध्ययन पुरें झाल्यावर त्या अंध गुरूनें ''आतां जगांत हिंडून मनुष्य जातीला आपल्या ज्ञानाचा उपदेश कर'' अशी आशीर्वादात्मक आज्ञा केली. येथें दयानंदाच्या आयुष्याचा दुसरा भाग संपतो.
स्वामींच्या धार्मिक मतांचा इतिहास थोडक्यांत पुढील प्रमाणें आहे. प्रथम पौराणिक ग्रंथांतील मतांचा, नंतर तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांतील मतांचा, आणि अखेर वैदिक ग्रंथांतील मतांचा पगडा त्यांच्या मनावर पडला.
स्वामी शैवपंथ सोडून वेदांतमार्गी बनले, व शेवटी सांख्य योगाला शेवटपर्यंत चिकटून राहिले. सर्व वेदग्रंथांचा अर्थ सांख्ययोगपर लावला पाहिजे असें त्यांचें मत होतें. आयुष्याची शेवटली वीस वर्षे स्वामींनीं सार्वजनिक कार्यांत घालविलीं. या काळांत धर्मोपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर ते फिरले. पुण्यामुंबईपासून कलकत्त्यापर्यंत व उत्तरेस लाहोरपर्यंत मोठमोठे पंडित, मौलवी व मिशनरी यांच्या बरोबर त्यांनी वादविवाद केले. प्रथम चार वर्षे स्वमतप्रतिपादन केल्यावर अधिक ध्यानमनन करण्याकरितां व चारित्र्य उत्तम बनविण्याकरितां ते गंगेच्या कांठीं जाऊन राहिले. या अल्पकालीन एकांतवासांत असतांनां स्वामींस प्रत्यक्ष भेटून आलेल्या एका यूरोपीय मिशनऱ्यानें त्यांचें वर्णन पुढीलप्रमाणें लिहून ठेविलें आहेः -
'सायंकालीं नदीच्या वाळवंटांत पाण्याच्या कांठाजवळ बसलेल्या एका फकीराची भेट मीं घेतलीं. त्याच्या विद्वत्तेबद्दल व पवित्राचरणाबद्दल मी अगोदर बाजार पेठेंत पुष्कळांच्या तोंडून ऐकलें होतें. त्या ठिकाणीं तो फकीर एका गवताच्या आसनावर बसलेला होता. त्याचें शरीर भीमासारखे भक्कम व जाडजूड असून चेहरा पाणीदार होता. तो बहुतेक नग्नप्राय स्थितींत होता. मी जवळ गेल्याबरोबर त्यानें आनंदानें संभाषणास सुरुवात केली. संसाराचा पूर्ण त्याग करून परमेश्वरचिंतनांत तो काल घालवीत असे. झालेल्या संभाषणावरून सदरहू फकीराचें मन सुसंस्कृत आणि बुध्दि प्राचीन वैदिक ग्रंथांत तरबेज असल्याचें दिसून आलें. तो संस्कृतमध्यें बोलत होता त्यामुळें आमचें संभाषण एका दुभाष्या मार्फत झालें'
सुमारें अडीच वर्षांनीं स्वामी दयानंद एकांतवास सोडून पुन्हां सार्वजनिक वादविवाद करीत फिरूं लागले. हिंदूंचे प्रसिध्द क्षेत्र काशी वगैरे ठिकाणीं ते मुद्दाम वेदामध्यें मूर्तिपूजा आहे काय? या विषयावर व्याख्यानें देत असत. मूर्तिपूजेविरुध्द त्यांनीं फार जोराची मोहीम सुरू केली. व त्या कामीं आपला दृढनिश्चय तसेंच स्वतःचे मोठें वजन आणि असामान्य वक्तृत्व त्यांनी खर्च केलें.
मुंबई येथें १८७५ एप्रिल १० रोजीं स्वामी दयानंदांनीं आपला आर्यसमाज स्थापन केला. १८७७ मध्यें दिछी येथें भरलेल्या बडया दरबाराच्या वेळीं हजर राहून स्वामींनीं पंजाबांतील कांही सुप्रसिध्द गृहस्थांच्या गांठी घेतल्या. तेव्हां पंजाबांत येण्याबद्दल त्यांनां आमंत्रण झालें. तें मान्य करून स्वामी त्या प्रांतांत गेले. ती त्यांची पंजाबला पहिलीच भेट होती. त्यांच्या संस्थेनें पुढें जेथें विजय मिळविले तें क्षेत्र हेंच होय. १७८८ ते १८८१ या काळांत आर्यसमाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांच्या दरम्यान मोठा चमत्कारिक संबंध आला; पण पुढें दोघे परस्पराबद्दल नाखूष झाले; कारण देवाच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल त्यांच्यामध्यें मोठा मतभेद उत्पन्न झाला. याशिवाय स्वामी दयानंदाचा ब्रह्मसमाजाचे देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्रसेन, थिऑसॉफिकल सोसायटीचे मॅडम ब्लॅव्हाटस्की आणि कर्नल आल्कॉट, प्रार्थनासमाजाचे भोलानाथ साराभाई, सुधारक मुसुलमानी पंथाचे सर सय्यद अहमद, आणि ख्रिस्ती पंथाचे डॉ. टी. जे. स्कॉट आणि रेव्ह. जे. ग्रे इत्यादि निरनिराळया संप्रदायांच्या पुढाऱ्यांशीं संबंध आला. स्वामीं दयानंदांनीं प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज व आर्यसमाज सर्व एक करावे अशी सूचना त्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांनां केली होती; पण ती कोणासच मान्य झाली नाहीं.
१८८२-१८८३ मध्यें स्वामींनीं राजपुतान्याला भेट दिली आणि तेथें ते अनेक संस्थानिकांचे स्नेही व सल्लागार बनले. जोधपूरच्या महाराजांची बदफैली वर्तनाबद्दल स्वामींनीं चांगली कानउघाडणी केली असें सांगतात. या नंतर लवकरच स्वामी आजारी पडले. त्यांना अन्नामधून विषप्रयोग केला गेला असें कोणी म्हणतात. तें कांहीं असलें तरी हें मात्र खरें कीं, त्याच दुखण्यांत स्वामींचा शेवट झाला. १८८३ आक्टोबर ३० रोजीं अजमीर येथें स्वामी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी परलोकवासी झाले.
स्वामी दयानंदांची प्रकृति फारच चांगली, चेहरा भव्य आणि मन दृढनिश्चयी होतं. मूर्तिपूजकांबरोबरच्या वादविवादांत महामूर्ख हें विशेषण त्यांच्या तोंडून फार येत असे. त्यांचें संस्कृत ग्रंथांतील पांडित्य, समयसूचकता आणि आत्मविश्वास मोठया पुढाऱ्याला योग्य अशींच होतीं.

No comments:

Post a Comment