Monday, January 19, 2015

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?


पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे
एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर
उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड
आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स
ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर
बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन
सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त
गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

###
सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस
करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके
घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात
सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल
आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह
मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर
तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न
करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
###
४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २
चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग
उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे
बेस्ट आहे ते शोधावे.
###
प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे
त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे
ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर
चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते
कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ
समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते
कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह
मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं
होईल.
###
पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग
सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून
बाकी आहेत सोडवायचे.
###
पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५
सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू
सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं
टेन्शन कमी होईल.

Saturday, January 17, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा :राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj

(२६ जून १८७४६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजछत्रपती राजर्षी शाहू महाराजसंस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.


त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.



कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.



वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.



शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.



हुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.



खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.



मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).



याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.



सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).



शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.



शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.



संदर्भ : 1. Keer, Dhananjay, Shahu Chhatrapati, A Royal Revloutionary, Bombay, 1976.

    2. Latthe, Annasaheb , Memoirs of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja, Kolhapur, १९२४.

   ३. नाईक, तु. बा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुणे, २००५. 

   ४. पवार, जयसिंगराव संपा., राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, कोल्हापूर, २००१. 

  ५. सूर्यवंशी, कृ. गो. राजर्षी शाहू : राजा व माणूस, पुणे, १९८४.

पवार, जयसिंगराव
source : marathi vishvkosh

Friday, January 16, 2015

MPSC राज्यसेवा पूर्वची तयारी कशी करावी ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राज्य सरकारच्या सेवतील सुमारे २१ संवर्गातील प्रवर्ग-२, प्रवर्ग-१, तसेच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या स्पर्धापरीक्षेला दरवर्षी सुमारे तीन-चार लाख विद्यार्थी बसतात. यातील अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक तयारी करून परीक्षेला बसतात. परीक्षार्थींच्या मोठय़ा संख्येमुळे स्पर्धा ही अटीतटीची असते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीला जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी यश मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण पदवी परीक्षेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांला असताना परीक्षेची तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, काही कारणाने पदवीच्या प्रथम किंवा दुसऱ्या वर्षांला असताना तयारी करणे शक्य झाले नाही तर परीक्षेला बसण्याआधी किमान वर्षभर तरी या परीक्षांची तयारी करणे योग्य ठरते.
सर्वप्रथम राज्य पाठय़पुस्तक मंडळाची इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतची सर्व पुस्तके दोन ते तीन वेळा वाचावीत. मागच्या काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास असे जाणवते की, साधारणत: २५ ते ३० टक्के प्रश्न हे या अभ्यासक्रमावर बेतलेले असतात.


  • राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ

० चालू घडामोडी- या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज काही अग्रगण्य दैनिकांचे वाचन करून त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचे टिपण काढल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो.
० इतिहास- इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. संदर्भपुस्तके: आधुनिक भारताचा इतिहास - बिपीनचंद्रा (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.) आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.)
० भूगोल - सर्वप्रथम इ. पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. संदर्भपुस्तके:  भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा समग्र भूगोल-
प्रा. ए. बी. सवदी
० पर्यावरण व परिस्थितिकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापरही करता येईल.
संदर्भपुस्तक: पर्यावरण व परिस्थितिकी - आपले पर्यावरण-  (प्रकाशक- नॅशनल बुक ट्रस्ट)
० भारतीय राज्यघटना - इ. अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके:  भारतीय राज्यघटना - एम. लक्ष्मीकांत (इंग्रजी).
आपली संसद - डॉ. सुभाष कश्यप (मराठीत भाषांतरित).
० आíथक व सामाजिक विकास- अकरावी-बारावीची क्रमिक पुस्तके. संदर्भपुस्तके: भारतीय अर्थव्यवस्था - प्रतियोगिता दर्पण (हे िहदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकातील अखेरीस नमूद केलेले प्रश्न अवश्य वाचावेत.) महाराष्ट्राची आíथक पाहणी.
० विज्ञान आणि तंत्रज्ञान- इ. सहावी ते इ. दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके: स्पेक्ट्रम पब्लिकेशनची इंग्रजी पुस्तके. पुस्तकांव्यतिरिक्त योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकांमधील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत.


  • सी सॅट पेपर २ ची तयारी कशी करावी?

राज्यसेवेच्या परीक्षेत जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हापासून सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. हा पेपर २०० गुणांचा असून ८० प्रश्न दोन तासांत सोडवावे लागतात. गेल्या दोन वर्षांच्या निकालांचा अभ्यास केल्यास असे स्पष्ट होते की, ज्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये गती होती, त्यांना हा पेपर सोडवणे सोपे गेले. या पेपरची तयारी करताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गरसमज आहेत. उदा. सी सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर. या पेपरमध्ये गणित हा एक उपघटक आहे. गणितावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये गती नसेल त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, साधारणत: ८० प्रश्नांपकी ४० ते ५० प्रश्न आकलन या उपघटकावर होते, तसेच पाच प्रश्न निर्णयक्षमतेवर होते. म्हणजे थोडक्यात गणित या उपघटकाचा संबंध अत्यंत कमी येतो. या पेपरमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी अधिकाधिक सराव करणे आवश्यक ठरते. यात आकलन या महत्त्वाच्या उपघटकाचा अभ्यास करण्यासाठी वाचनवेग वाढवावा. अग्रगण्य दैनिकांतील संपादकीय लेखांचे वाचन करावे. वाचन झाल्यानंतर त्या लेखात विश्लेषणात्मक पद्धतीने मांडलेल्या मतांचा, विचारांचा अभ्यास करावा. असे केल्यास आपली आकलनक्षमता वाढते आणि याचा आपल्याला परीक्षेत उपयोग होतो. या पेपरमधील बुद्धिमत्तेविषयीच्या प्रश्नांची तयारी करताना सामान्य मानसिक क्षमता, आकृत्यांवरील प्रश्न, व्हेन आकृतीवरील प्रश्न, त्रिकोन, चौकोन मोजणे, दिशाबोध, नाते संबंधावरील प्रश्न, दिनदíशका, घडय़ाळ व वयासंबंधित प्रश्न, आरशातील प्रतिमा, जलप्रतिमा, घन व सोंगटय़ांवरील प्रश्न यांची तयारी करावी.

० जनरल मेन्टल एबिलिटी अ‍ॅण्ड बेसिक न्युमरसी (गणित)-
या घटकांतर्गत गणिताच्या काही संकल्पना येतात. उदा. काळ, काम, वेग यांवरील उदाहरणे, आगगाडीशी संबंधित उदाहरणे, बोटीशी संबंधित उदाहरणे, मांडणीसंदर्भात काही उदाहरणे, तसेच या घटकाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासक्रमात नमूद केलेल्या डाटा इंटरप्रिटेशन या घटकाचीही तयारी होऊन जाते. या घटकाची तयारी करण्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतची राज्य पुस्तक मंडळाची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत. 'सिक्स्टी डेज वंडर इन मॅथ्स' या पुस्तकाचीही मदत होईल. मात्र या उपघटकाची तयारी करण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेबरोबरच पीएसआय व एसटीआयची तयारी करत असतील  त्यांनी या घटकाची तयारी नीट करावी.

इंग्रजीचे महत्त्व 
एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत इंग्रजीचा पेपर असतो. मात्र, त्याच्या गुणांचा विचार अंतिम यादीसाठी केला जात नाही. मात्र या प्रश्नपत्रिकेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या प्रश्नपत्रिकेत नापास झाल्यास इतर पेपर तपासले जात नाहीत. मात्र, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी १०० गुणांचा इंग्रजीचा पेपर अनिवार्य असतो. या पेपरचे गुण अंतिम यादीसाठी धरले जातात, म्हणून एमपीएससीच्या दृष्टीने या पेपरचे महत्त्व अधिक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने या पेपरची तयारी करावी. एखादे इंग्रजी नियतकालिक नियमितपणे वाचणे तसेच दररोज इंग्रजीत लिहिण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते.

अनिवार्य मराठीची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत मराठी व इंग्रजीचे दोन पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे- १०० गुणांसाठी असतात. यातील गुण अंतिम यादीत धरले जातात, म्हणून चांगले गुण प्राप्त करून अंतिम यादीत निवड होण्यासाठी या पेपरच्या गुणांचे महत्त्व अधिक आहे. मराठी भाषा मातृभाषा असल्याने अनेक विद्यार्थी या पेपरला गृहीत धरतात; मात्र तयारी करताना सर्वप्रथम आयोगाच्या अभ्यासक्रमाचे बारकाईने अवलोकन करावे. आपले हस्ताक्षर सुवाच्च असावे. मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचा महत्त्वाचा उपघटक आहे. या उपघटकाची तयारी  करताना वेळोवेळी निबंध लिहून ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. परीक्षेत विचारले जाणारे निबंध वैचारिक, कल्पनात्मक, आत्मकथनपर किंवा ज्वलंत प्रश्नांवर आधारित असतात. या सर्व घटकांवर लिहिण्याचा सराव करावा. निबंध या घटकाव्यतिरिक्त पत्रव्यवहार, वृत्तांतलेखन यांसारख्या उपघटकांवरदेखील लिहिण्याचा सराव करावा. भाषांतरावरही एक प्रश्न असतो. इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करायचे असते. यासाठी सर्वप्रथम तो उतारा समजून घेऊन त्याचा आशय लक्षात घेऊन नेमक्या शब्दांमध्ये त्याचे भाषांतर करणे आवश्यक असते. .

हे हि वाचा :

Thursday, January 15, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा :महादेव गोविंद रानडे (Mahadev Govind Ranade)

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (जानेवारी १६, इ.स. १८४२ - जानेवारी १६, इ.स. १९०१) ऊर्फ माधवराव रानडे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

जीवन

महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.

विवाह

म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.

न्यायाधीशी

काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.[१]

सार्वजनिक कार्य

ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्ऱ्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.

संस्था

दिनांक ३१ मार्च, इ.स. १८७६ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.
न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.

लोकांचा रोष

विष्णुबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला.

सरकारी रोष

माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.

म.गो. रानडे यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

  • न्या. म. गो. रानडे व्यक्ति कार्य आणि कर्तृत्व (१९९२-त्र्यंबक कृष्ण टोपे)
  • मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष (१९६४-म.गो. रानडे)
  • पुनरुत्थानाचे अग्रदूत - म.गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र (२०१३-ह.अ. भावे)
  • आमच्या आयुष्यातील काही आठवणी (१९१०-रमाबाई रानडे)
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चरित्र (१९२४-न.र. फाटक)
  • रानडे-प्रबोधन पुरुष (२००४-डॉ. अरुण टिकेकर)
  • Mahadev Govind Ranade (इंग्रजी १९६३-टी.व्ही. पर्वते)
  • Mr. Justice M. G. Ranade : A Sketch of the Life and Work. (इंग्रजी-जी.ए.मानकर).
  • Ranade : The Prophet of Liberated India (इंग्रजी १९४२-डी.जी. कर्वे).

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी


"न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे" (मराठी मजकूर). महाराष्ट्र नवनिर्माण सेना. १४ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
Source: W
ikipedia

एमपीएससी मुख्यपरीक्षा :आचार्य विनोबा भावे (Vinoba Bhave)

(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. यांची जात चित्पावन ब्राम्हण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायनतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजा भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.

वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वता (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्त्रबुद्धे इ. मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक. तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बांजूनी मीमांसाही चालत असे. दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इ. सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणानकारक रीतीने या साप्ताहिक संभामध्ये मांडीत असत . १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तिरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारूण येथे प्राज्ञपाठशाळचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगत केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. म. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !"

विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट म. गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला. गीता, उपनिषदे यांचे पठन करीत विनोबा घरीच राहिले. नंतर पुन्हा साबरमतीत आश्रमात राहण्याकरता अहमदाबादेत परतले.
९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून म. गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबध आयुष्य -१९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या ८ किमी. परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धांत आहे. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होय. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी म. गांधीची मुलभूत रकजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी म. गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.

९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांस्तव शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.
प्रमुख शिष्यांसमवेत पदयात्री विनोबाप्रमुख शिष्यांसमवेत पदयात्री विनोबा

या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली. लो.टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानला नाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टीकोन मान्य केला, असे दिसून येते. मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टीकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. म. गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृद्यात चाललेल्या सद्‍भावना व असद्‍भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत; असे म, गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि म. गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्‍गीता वाचत असताना विनोबा भगवद्‍गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि म. गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही. म्हणूनच, गीता जरी सशस्त्र हिंसात्मक युद्धाचा पुरस्कार करत असली, तरी गांधींना आणि विनोबांना या गीतेने कायम मोहून टाकले आहे. म्हणून गांधींनी आणि विनोबांनी जन्मभर सकाळ-संध्याकाळ चालविलेल्या प्रार्थनासंगीतात भगवद्‍गीता ही कायमची अंतर्भूत केली होती.

वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाबरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.
९५१ साली सशस्त्र क्रांतिवादी कम्युनिस्टांनी तेलंगणामध्ये जमीनदार वर्गावर हल्ले सुरू केले. अहिंसक क्रांतीचा संदेश म. गांधीनी जगाला दिला. परंतु तो भारतालाही समजला नाही, तर जगाला कसा समजेल ? असा प्रश्न त्यामुळे उत्पन्न झाला. गांधीवाद हा गांधींबरोबरच स्वर्गवासी झाला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे उत्तर अस्तिपक्षी म्हणजे या भूतलावरच शांतिमय क्रांतीचे कार्य पुरे व्हावयाचे आहे अशा तर्‍हेचा विश्वास निर्माण करण्याकरता 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत्'ची घोषणा विनोबांनी केली. ७ मार्च १९५१ रोजी आंध्रमधील शिवरामपल्ली या गावाला पोहोचण्यासाठी विनोबांनी सेवाग्रामहून पदयात्रा सुरू केली. सर्वोदय संमेलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ५ मुद्यांचा कार्यक्रम सांगितला. आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, श्रम, शांती व समर्पण हे ते पाच मुद्दे होत. ही पदयात्रा म्हणजे भूदानाचे ऐतिहासिक आंदोलन होय. १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात पोचमपल्ली गावी विनोबा पोहोचले. हे कम्युनिस्ट नक्षलहाद्यांचे केंद्र होते. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले की, 'मी आजपासून भारतातील भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचा प्रयोग करीत आहे. जमिनीची योग्य वाटणी झाली तरच खरी सामाजिक क्रांती-विशेषतः स्वयंपूर्ण ग्रामराज्याकडे नेणारी क्रांती-निर्माण होऊ शकेल' ही यात्रा सुरू झाल्यानंतर ७० दिवसांत एकूण १२ हजार एकर जमीन मिळाली. त्यानंतर पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून पंचवार्षिक योजनांसंबंधी विचारविनिमय करण्याकरता विनोबा पायीच दिल्लीकडे निघाले. १२ सप्टेंबर १९५१ रोजी दिल्लीला पोहचले. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक, महराष्ट्र इ. राज्यांमधून सु. साडेतेरा वर्षे पदयात्रा करून सेवाग्रामला विनोबा पोहोचले. साऱ्या जगाचे लक्ष या ग्रामदानच्या आंदोलनाकडे त्यांनी वेधून घेतले. वय वर्षे ५५ ते ६८ पायी यात्रा करून सारा भारत देश त्यांनी पाहिला. चाळीस हजार मैल चालले. मध्य प्रदेशात आले. तेथील डाकूंच्या क्षेत्रात पदयात्रा चालू असता १९ दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. १९७० साली पवनार येथे येऊन क्षेत्रसंन्यास घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. या भूदान आंदोलनाचे एकंदरीत फलित काय निघाले, यासंबंधी काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. हे भूदान आंदोलन एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होय, असे वाटून जगातील मोठमोठे राजकीय ध्येयवादी व विचारवंत विस्मित झाले. 'सब भूमी गोपाल की' असा भारतभर घुमणारा नारा देत ही शांतिमय क्रांती सुरू झाली. शांतिमार्गानेच सर्वोदय होणार, राजकीय सत्तेची शक्ती अथवा शस्त्रसक्ती यांच्यापेक्षा ही प्रेमाची शक्तीच क्रांती घडवून आणील, असे भविकांना वाटले. परंतु सर्वोदय न होता अर्धोदय झाला व लगेच ते क्रांतीचे बिंब अस्ताला गेले, गडप झाले.

पवनार येथे ४ ऑक्टोंबर १९७० रोजी मोठ्या प्रमाणात विनोबांचा अमृतमहोत्सव झाला. ८ ऑगस्ट १९७२ मध्ये 'गीत प्रतिष्ठान' ची स्थापना केली. २२ एप्रिल १९७९ रोजी त्यांनी गोहत्याबंदीसाठी उपोषण सुरू केले आणि २६ एप्रिलला उपोषण समाप्त केले; कारण लोकसबेत इंदिराजींनी हा विषय समवर्तीसूचीत घेण्याचे आश्वासन दिले.

लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर १९६६ साली इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्रिपदावर आल्या. १९७५ मध्ये इंदिरा गांधीनी आणीबाणी पुकारली. त्यात वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणि सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींवर बंधने घालण्यासाठी आली. लक्षावधी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या निर्णयावाचून बंदिवासात डांबण्यात आले. त्या वेळी विनोबांनी या आणीबाणीचे समर्थन केले. त्यांनी या कालखंडाचे ' अनुशासन पर्व ' म्हणून भव्य नामकरण केले. तेव्हा  विनोबांच्या आश्रमातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकाचेही अंक पोलिसांनी जप्त केले. तेव्हा विनोबांनी केवळ स्मित हास्य केले. त्यामुळे विनोबा हे ' सरकारी संत ' म्हणून अवहेलनेस पात्र झाले. इंदिरा गांधींच्या पक्षाचा त्यानंतर निवडणुकीत पराभव झाला. जनता पक्षाचे राज्य आले. ते २।। वर्षांपेक्षा जास्त टिकले नाही. पुन्हा १९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींचा विजय झाला, त्यावेळी विनोबांनी मौनव्रत स्वीकारले असतानाही आनंदाने टाळी वाजवली, ही टाळी देशभर ऐकू गेली ! विनोबांच्या निधनानंतर अनेक दैनिक व साप्ताहिक नियतकालीकांनी हे सगळे विसरून मोठ्या भक्तिभावाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली; परंतु काहींनी आणीबाणीतच विनोबा कैलासवासी झाले, असे म्हटले. परंतु फार मोठा भारतीय मतदार वर्ग आणीबाणीमुळे इंदिराजींबद्दल नाराज झाला. तरी ती नाराजी थोडा वेळच टिकली. याच मतदारवर्गाने इंदिराजी व त्यांच्या पक्षास १९८० च्या जानेवारीत प्रचंड विजय मिळवून दिला. म्हणून आणीबाणीची मीमांसा अधिक खोलीत जाऊन केली तरच इंदिराजींच्या विजयाचा व विनोबांच्या टाळीचा अर्थ कळू शकेल. त्याकरता आणीबणीअगोदरच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. आणीबाणीच्या अगोदर लोकशाही निर्वाचनपद्धतीने यथोचित निवडून आलेल्या गुजरात व बिहारमधील विधानसभांच्या विसर्जनाची संसदीय लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे अवैध असलेली चळवळ जयप्रकाशजींनी आरंभली. वैध रीतीने रीतसर निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची भयंकर विटंबना करण्यात आली. अशा प्रकारच्या राजकीय घटना लक्षात घेतल्या म्हणजे आणीबाणीच्या कालखंडाचा अर्थ नीट लागतो. आणीबाणीत अतिरेक झाले होते. टोल्यास प्रतिटोला हेच त्याचे स्वरूप होते, त्यामध्ये अनेक अत्याचार झाले. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही अशीही हमी इंदिरा गांधींकडून जनतेला देण्यात आली. विनोबांच्या आनंदी टाळीला या देशातील फार मोठ्या मतदार वर्गाने दाद दिली, हे त्या संदर्भात विसरता कामा नये. त्यांचा आधुनिक युगाला एक महत्त्वाचा संदेश आहे -'हे विज्ञानयुग आहे. या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली, तर मनुष्यजातीचा उद्धार होईल'.

विनोबांची बहुतेक पुस्तके मूळ मराठी अथवा हिंदीत आहेत. गुजरातीत काही प्रवचने आहेत. साम्यसूत्र हे संस्कृतात आहे. सर्व आधुनिक भारतीय भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या ग्रथांची संख्या सु. २०० वर भरते. त्यांतील त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे : मराठी : मधुकर, गीताई, गीताप्रवचन, ईशावास्यवृत्ति, स्वराज्यशास्त्र आणि सर्वोदय विचार, लोकनागरी लिपि, गांधी तत्त्वज्ञान, सर्वोदयाची विविध घोषणा, ज्ञानदेव चिंतनिका, भागवत धर्म मीमांसा, स्थितप्रज्ञ-दर्शन, भूदानयज्ञ-समग्रदर्शन, स्त्री-शक्ती, दीक्षा इत्यादी. हिंदी: जपुजी, विनोबाके विचार (३ भागांत), जीवन और शिक्षण, शिक्षण विचार, भूदानगंगा (८ भागांत), ग्रामदान, भूदानयज्ञ, सर्वोदय विचार और स्वराज्यशास्त्र, सर्वोदय की ओर, भाषा का प्रश्न, गावगाव मे स्वराज्य, सयंम और संतति, प्रेमपुर्ती ईसा, विनोबा चिंतन (४८ भागांत), तीसरी शक्ती, नामघोषानवनीत (संपादित), बापू के चरणो मे (संपा.), कुरान सार इत्यादी. संस्कृतः ऋग्वेद सार संकलन, साम्यसूत्रे,वेदान्तसुधा (संकलन) इत्यादी. यांतील बहुतांश ग्रथांचे इतर आधुनिक भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.
दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. निधानाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ज्वर आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्विकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इ. मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी , औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"

विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा.विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा.
चार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युत्‍वेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरूषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारसा होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे. जैन धर्मात या तंत्रास ' सल्लेखना ' अशी संस्कृत संज्ञा आणि परंपरा ' संथारा ' ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास ' प्रायोपवेशन ' म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे. ज्ञानदेवादी संतती योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. अलीकडची स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी, साने गुरूजी इत्यादिंकांनी देह त्याग करण्याची उदाहरणे प्रसिद्धच आहेत.

भारत सरकारने विनोबांना 'भारतरत्‍न' (मरणोत्तर-१९८३) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

पहा : ग्रामराज्य; भूदान.

संदर्भ : 1. Lanza, Del Vasto, Gandhi to Vinoba- The New Pilgrimage, 1956.
    2. Narayan, Shriman, Vinoba: His Life and Work, Bombay, 1970.
    3. Sharma, Jagdish Saran, Vinoba and Bhoodan, New Delhi, 1956.
    4. Tandon, P.D. Ed. Vinoba Bhave : The Man and His Mission (A Symposium), Bombay.
    5. Tennyson, Hallam, Saint on the March: The Story of Vinoba, Delhi. 1955.
    ६. देशपांडे, निर्मला, विनोबांच्या सहवासात, वर्धा, १९५५.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

Source: Marathi Vishvkosh



Wednesday, January 14, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा :महर्षी विठ्ठल शिंदे (Maharshi Vitthal Shinde)

(२३ एप्रिल १८७३ – २ जानेवारी १९४४). महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.

मखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. १८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा  ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

र्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.

भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. १९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे ह्या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे, हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला; तर उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे, हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला. मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा अशांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडिल हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थपनेनंतर सहा वर्षांतच एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, १,१०० मुले, ५ वसतिगृहे, अन्य १२ संस्था व ७ आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला. १९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. १९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.
शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.

शिंदे यांना संशोधन-लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्थाविषय होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इ. विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते; हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर ऊहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दखविले आहे. ‘भागवत धर्माचा विकास’ ह्या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, याचे विवेचन केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश (१९१२) या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेखसंग्रह (१९६३) या पुस्तकात संग्रहीत करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान (१९७९) ह्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात (१८९८), इंग्लंडमध्ये (१९०१०३) व येरवड्याच्या तुरुंगात (१९३०) असताना लिहीलेली रोजनिशी (प्रकाशन १७७९) व माझ्या आठवणी व अनुभव (प्रकाशन १९४३; १९५८) हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात.

स्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.

महर्षी विठ्ठल रामजी महर्षी विठ्ठल रामजी

संदर्भ : १. कदम, शंकरराव; मुलाटे, उषा; महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, औरंगाबाद, २०००.
     २. चव्हाण, रा. ना. महर्षी शिंदे यांच्या आठवणी, वाई, १९७५.
     ३. दिघे, पी. डी. दोन कर्मवीर, कोल्हापूर, १९९२.
     ४. पवार, गो. मा. विठठ्ल रामजी शिंदे, नवी दिल्ली, १९९०,
     ५. बाबर, कृ. भा. कर्मवीर विद्यार्थी, भिलवडी १९३०.

पवार, गो. म
Source: Marathi Vishvkosh

एमपीएससी मुख्यपरीक्षा :राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj)

१८७४६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजछत्रपती राजर्षी शाहू महाराजसंस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.

त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

हुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.

मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).

याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.

स्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

संदर्भ : 1. Keer, Dhananjay, Shahu Chhatrapati, A Royal Revloutionary, Bombay, 1976.
    2. Latthe, Annasaheb , Memoirs of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja, Kolhapur, १९२४.
   ३. नाईक, तु. बा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुणे, २००५. 
   ४. पवार, जयसिंगराव संपा., राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, कोल्हापूर, २००१. 
  ५. सूर्यवंशी, कृ. गो. राजर्षी शाहू : राजा व माणूस, पुणे, १९८४.

पवार, जयसिंगराव

Source: Marathi Vishvkosh

Tuesday, January 13, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा : महर्षी कर्वे (Maharshi Karve)

(१८ एप्रिल १८५८ - नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.


१८९१ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे सुमारे २३ वर्षे त्यांनी फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचे कार्य केले. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ स्थापन केली. या संस्थेच्या फंडाच्या व्याजाचा उपयोग पुनर्विवाहेच्छू विधवांच्या मदतीसाठी केला जात असे. १ जानेवारी, १८९९ रोजी त्यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात केली. (याच संस्थेला पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे.)  १९०० साली महर्षी कर्वे यांनी आश्रमासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधले. येथेच त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली. १९०७ साली त्यांनी ‘महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात बालसंगोपन, आरोग्य, गृहजीवन शास्त्र आदी विषयांचे प्रशिक्षण महिलांना दिले जात होते. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार कर्वे यांनी पुढे शिक्षणपद्धतीत व अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्या. म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. नेहरू अशा अनेक मान्यवर नेत्यांनी प्रत्यक्ष हिंगणे येथे भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.

१९१४ साली फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सारा वेळ आश्रम आणि महिला विद्यालयाकडे देता येऊ लागला. १९१६ साली त्यांनी जपानच्या धर्तीवर महिला विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ मानले जाते.या विद्यपीठाच्या महाविद्यालयाचे कर्वे हे पहिले प्राचार्य झाले. पुढील वर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्‍या विद्यालयाची त्यात भर पडली. [या विद्यापीठाचे पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ] (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) - असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम मराठी होते. परंतु इंग्रजी या ज्ञानभाषेचे शिक्षण, नर्स (परिचारिका) प्रशिक्षण आदी विशेष अभ्यासक्रमही विद्यापीठात शिकवले जात असत.

खेड्यातील महिलांना शिक्षित  करण्याच्या कार्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे असे ठरवून त्यांनी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ नावाची संस्था उभी केली. समाजामध्ये समता यावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी तीनशे समविचारी सहकार्‍यांना बरोबर घेऊन १९४४ साली ‘समता संघ’ स्थापन केला. स्थापन केलेल्या संस्थांना त्यागी वृत्तीने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते मिळण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते घडवणार्‍या ‘निष्काम कर्ममठ’ या संस्थेची स्थापना सुरुवातीलाच केली होती . 

अल्बर्ट आइनस्टाइन, मादाम मॉंटेसरी, रवींद्रनाथ टागोर या विद्वानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९४२ साली बनारस हिंदू युनिर्व्हसिटीने त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. १९५८ साली, वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महर्षी कर्वे यांना महाराष्ट्र ‘अण्णा’ या नावानेही ओळखतो. प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी जगलेले अण्णा सुमारे १०५ वर्षांचे कृतकृत्य जीवन जगले.     
पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनया संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी अण्णासाहेब कर्वे   महर्षी अण्णासाहेब कर्वे आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले; पण तरीही डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळकाढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली अनाथ बालिकाश्रमया संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही (१९२९-३२) मिशनरी बाण्याने वणवण केली.


महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज मुरुड फंड’ (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला निष्काम मठ’ (१९१०), ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ (१९३६), जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला समता-संघ’ (१९४४) इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.

आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.

संदर्भ : १. नित्सुरे, य. गो. भाग्यवान शतायुषी, पुणे, १९५८.
     २. शिखरे, दा. न. महर्षि अण्णासाहेब कर्वे, पुणे, १९५८. 

माडगूळकर, अं. दि.