Friday, February 6, 2015

ग्रामप्रशासन अभ्यास (एमपीएससी मुख्यपरीक्षा)

★ ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे
ग्रामपंचायत संदर्भात झालेले
महत्त्वाचे बदल
ग्रामसभा
ग्रामपंचायत सदस्य संख्या
ग्रामपंचायत सदस्या करिता राखीव जागा
ग्रामपंचायतीची मुदत
निवडणुकीच्या काळात
पाळाव्या लागणाऱ्या आचार
संहितेचे नियम
७३ व्या घटनादुरुस्तीमध्ये
ग्रामपंचायतीच्या कामाच्या यादीत
पुढील विषय दिलेले आहेत
• ग्रामसूची किंवा अनुसूची -१
• राज्य वित्त आयोग
ग्रामसभा -
महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या कायदयाने अगोदरच ग्रामसभा सुरु झाल्या होत्या. आता घटना दुरुस्तीमुळे या ग्रामसभांना घटनात्मक
दर्जा मिळाला आहे. ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.
या सदस्यांना ग्रामसभेच्या बैठकांना उपस्थित राहण्याचा आणि ग्रामपंचायतीच्या विकासासंबंधी माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. तसेच त्यांना गावच्या विकासात
सहभागी होण्याचा, त्याची दिशा ठरविण्याचा अधिकार आहे. आता वर्षभरात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे बंधनकारक असून २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि १ मे या तारखांना ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. तर उर्वरित दोन पैकी पहिली एप्रिल मध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा अहवाल व जमाखर्च मांडण्यासाठी आणि पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन व अंदाजपत्रक
तयार करण्यासाठी घेणे आवश्यक आहे. आता कायदयाने ग्रामसभांचे कार्यक्षेत्र, नियम, अटी, ग्रामसभा घेण्याच्या पद्धती व ग्रामसभांसाठी स्त्री-पुरुषाचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती व स्पष्ट आदेश
दिलेले आहेत. पंचायतराज मध्ये विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच गावाचे निर्णय
आता गावपातळीवर घेणे शक्य होईल. तसेच आरक्षणामुळे मागासवर्गीय व
स्त्रियांना प्रतिनिधीत्व करण्याची आणि त्यांच्या प्राधान्य क्रमाच्या गरजांना न्याय देण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच ग्रामसभा हे असे व्यासपीठ आहे की, ज्याचा उपयोग मागासवर्गीय जाती, स्त्रीया, गरीब हे विकासामधील त्यांचा हिस्सा त्यांना मिळावा, त्यांच्या गरजा, आशा आकांक्षांना न्याय मिळावा यासाठी करू शकतात. ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेत सर्व
ग्रामस्थांनी सहभाग घेणे व एकूणच
विकासाच्या विविध टप्प्यामध्ये
सहभागी होणे आणि तसेच ग्रामपंचायतीला नियोजन कामाबाबत
जबाबदारी ठरविणे आता शक्य झाले आहे. ग्रामसभामध्ये अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करणे अपेक्षित असून योजना/ कार्यक्रमाचे अंदाजपत्रक व हिशोब सादर करण्याबाबत तरतूद आहे.
ग्रामपंचायत सदस्य संख्या -
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरविली जाते. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या, वार्डाची संख्या व रचना, राखीव जागांची संख्या व प्रमाण हे जिल्हा व तालुका पातळीवरील यंत्रणेमार्फत ठरविले जाते. त्यासाठी सर्व सामान्य नियम पुढील तक्त्यामध्ये दिले आहेत. -
अ.क्र. लोकसंख्या
ग्रामपंचायत सदस्य संख्या
वार्डाची संख्या
वार्ड निहाय सदस्य संख्या
१. १५०० पेक्षा कमी
७ ३ ३+२+२
२. १५०० ते ३०००
९ ३ ३+३+३
३. ३००१ ते ४५००
११ ४ ३+३+३+२
४. ४५०१ ते ६०००
१३ ५ ३+३+३+३+२+२
५. ६००१ ते ७५००
१५ ५ ३+३+३+३+३
६. ७५०१ पेक्षा जास्त
१७ ६ ३+३+३+३+३+२
वरील तक्त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये किमान सभासद ७ असतील तर जास्तीत जास्त १७ असतील. आता वरील सर्व जागा निवडणूकीने
भरण्यात येतील. यापूर्वी असलेली सहयोगी सदस्य पद्धती व निर्देशक पद्धती घटना दुरुस्तीमुळे रद्द झालेली आहे.
उदा. पूर्वी गावातील सहकारी संस्थेचे अध्यक्ष हे सहभागी सदस्य असत.
ती तरतूद रद्द करण्यात आली आहे. तसेच यापुढे जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य असणार नाहीत. कोणीही आमदार यापुढे जिल्हा परिषदेवर स्वीकृत असणार नाही.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विषय
समित्यावर दोन स्वीकृत सदस्य
घेण्याची तरतूदही रद्द करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यामध्ये खालील प्रमाणे राखीव जागा असतील. अनुसूचित जाती/ जमातींना पूर्वीप्रमाणेच
गावातील त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात राखीव जागा असतील.
त्यातील १/३ किंवा ३३ टक्के जागा अनुसूचित जाती/ जमातीतील स्त्रियांसाठी राखीव असतील.
इतर मागास वर्गीयांना तीनही ठिकाणी २७ टक्के जागा राखीव असतील. अशा राखीव जागा प्रथमच होत आहेत. त्यापैकी १/३ जागा इतर मागासवर्गीय स्त्रियांसाठी असतील.
आता तीनही ठिकाणी स्त्रियांसाठी १/३ राखीव जागा आहेत. या राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती/ जमाती व इतर मागासवर्गीय स्त्रियांसाठीच्या राखीव जागा समाविष्ट आहेत. त्यादेखील एकूण अनुसूचित जाती/
जमाती व मागासवर्गीयांच्या जागांपैकी ३३ टक्के असतील.
समजा एका गावांत एकूण सदस्य संख्या ९ आहे. त्यात ३३ टक्के जागा स्त्रियांसाठी आहेतच. म्हणजे तीन जागा राखीव आहेत. इतर
मागासवर्गीय अनुसूचित जाती/
जमातीसाठी ३ जागा.
ही विभागणी प्रत्यक्षात अशी राहील-
३ स्त्रियांसाठी जागा = २ खुल्या + १ मागासवर्गीय
३ मागासवर्गीय अनुसूचित
जमातीसाठी जागा = २ मागासवर्गीय
स्त्री-पुरुष + १ स्त्री परंतु १ मागासवर्गीय स्त्री दोनही ठिकाणी मिळून सामायिक असते.
म्हणून एकूण जागा वाटप असे.-
२ खुल्या स्त्रियांसाठी जागा
२ मागासवर्गीय स्त्री-पुरुषांसाठी जागा
१ मागासवर्गीय स्त्रीसाठी जागा
४ खुल्या जागा सर्वासाठी [स्त्री पुरुषांसाठी]
‘सरपंच’, पंचायत समिती ‘सभापती’
आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या पदासाठी सुद्धा राज्यांतील
लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती/ जमाती साठी राखीव जागा असतील. स्त्रियांसाठी १/३ जागा राखीव असतील. त्यात अनुसूचित जाती-जमाती/ मागासवर्गीय
स्त्रियांच्या राखीव जागांचा समावेश आहे.
उदा. एखादया तालुक्यामध्ये १००
ग्रामपंचायती असतील तर त्यापैकी ३३ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच असतील. व त्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय महिला संख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय महिला सरपंच असतील. यापुर्वी काही ठिकाणी सरपंचाचे पद पिढीजात ठरले जात असे. ही परिस्थिती ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे निश्चितच बदलू लागली आहे.
ग्रामपंचायतीची मुदत पाच वर्षाची करण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीना मुदत वाढ मिळणार नाही. यापूर्वी आपल्याकडे एकदा ग्रामपंचायत,
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका १२ वर्षानंतर झाल्या. आता अशी मुदत वाढ देणे हे
राज्य शासनाच्या अधिकारात नाही. जर काही कारणाने निवडून आल्यानंतर ५ वर्षाच्या आत ग्रामपंचायत बरखास्त झाली तर
सहा महिन्यांच्या आत परत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या निवडणूकांमध्ये निवडून आलेले
सदस्य हे फक्त पाच वर्षातील उरलेल्या काळात काम पाहतील. पंचायत राज्य व्यवस्थेतील ग्रामपंचायत, पंचायत
समिती व जिल्हा परिषद यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच निवडणूक
अधिकारी नेमले जातात व ते
पंचायतीच्या निवडणूका घेतात.
समजा एखादी ग्रामपंचायत अडीच वर्षानंतर बरखास्त झाली तर सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणूका घेऊन नवी ग्रामपंचायत तयार
झाली तरी तीची मुदत उरलेली अडीच वर्षेच राहील. पूर्ण पाच वर्ष ती नवी ग्रामपंचायत काम करू शकणार नाही.
मात्र समजा, साडेचार, सव्वाचार, सव्वाचार वर्षांनी जर पंचायत बरखास्त झाली तर मात्र इतर ग्रामपंचायतीच्या बरोबरच त्यांचीही निवडणूका होईल. तोपर्यंत ग्रामसेवक व पूर्वीचा सरपंच मिळून कारभार
चालवतील.
निवडणूक आयोग [मंडळाची] स्थापना –
७३ व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये पंचायत राज व्यवस्थेतील तीनही स्तरांवरील निवडणूका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे . यापूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत
सर्व अधिकार होते. आता प्रत्येक राज्यात स्वतंत्र निवडणूक आयोग असेल. या आयोगाला ग्रामपंचायत
सदस्यांची संख्या निश्चित करणे. वार्ड
निश्चित करणे, राखीव जागा ठरविणे,
निवडणूकीचा कार्यक्रम व तारीख ठरविणे इत्यादी अधिकार देण्यात आलेले आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद या बाबतही असेच
अधिकार निवडणूक मंडळाला आहेत. राखीव जागा फिरत्या असतील व त्यासंबंधीचे निर्णय निवडणूक आयोग घेईल.
निवडनुकीच्या काळात पाळाव्या लागणार्या आचारसंहितेचे नियम -
१. जात, धर्म, भाषा या आधारावर प्रचार करण्यास मनाई आहे.
२. धार्मिक चिन्हांचा वापर, धार्मिक
भावना भडकावणे इत्यादी मनाई आहे.
३. उमेदवारांच्या चारित्र्यांवर शिंतोडे उडवू नयेत, तसेच खोडसाळ आरोप करू नयेत.
४. त्या काळामध्ये नवीन विकास कामे व विकास योजना सुरु करता येत नाहीत व तसेच कर्मचाऱ्यांचा बदल्या करता येणार नाहीत
किंवा नोकर भारती करता येणार नाही.
६.निवडणूकीला उभे राहण्याकरिता वयाची अट –
* गावाच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री- पुरुष नागरिकास मतदानाचा हक्क आहे.
* ग्रामपंचायतीच्या मतदाराला ग्रामपंचायत सदस्य जागेसाठी वयाची २१ वर्षे पुर्ण झाल्याशिवाय निवडणूकीला उभे राहता येत नाही.
* कोणत्याही वार्डातून अशी त्याक्ती उमेदवार म्हणून उभी राहू शकते.
एकाच वेळी अनेक वार्डातून उभे राहता येते.
उमेदवारीचा छापील अर्ज निवडणूक
अधिकाऱ्याकडे मिळतो.
* सर्वसाधारण जागेवर उभे राहण्यासाठी रु. ५०/- शुल्क भरावे लागतात. राखीव जागेवर उभे
राहण्यासाठी रु. १०/- भरावे लागतात. त्या रकमेची पोहोच पावती मिळते.
* उमेदवारी मागे घेण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. त्याच्या आत अर्ज मागे घेता येतो. त्याकरीता लेखी अर्ज करावा लागतो.
* त्यानंतर निवडणूक अधिकारी उमेदवारीची अंतिम यादी प्रसिध्द करतात. प्रत्येक उमेदवारास
निरनिराळे चिन्ह देता येते.
* ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावावर किंवा त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविता येत नाही.
* प्रत्येक उमेदवारास जास्तीत जास्त रु. ५०००/- पर्यंतच खर्च करण्याची परवानगी आहे.
* ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी संबंधी राज्य शासनाने तयार केलेले नियम प्रत्येक उमेदवारास बंधनकारक असतील.
७.ग्रामपंचायतीची शक्ती, अधिकार
आणि जबाबदाऱ्या- ग्रामपंचायतीकडे ११ व्या अनुसूचीनुसार २९ कामे वर्ग
ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी योजना तयार करण्याचे अधिकार राज्य शासन ग्रामपंचायतीला देईल. तसेच ग्रामपंचायतीने करावयाच्या कामाची यादी घटनेच्या ११ व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली आहे ही कामे २९ प्रकारची आहेत. शेतजमीन सुधारणा, छोटे पाटबंधारे, पाण्याचे
नियोजन व पाणलोट क्षेत्र विकास, दूध उत्पादन- पशुसंवर्धन, कुक्कुटपालन. मत्स्य व्यवसाय,
सामाजिक वनीकरण, वनशेती व
वनसंपत्ती उत्पादन, लघुउद्योग, कुटिरोद्योग, खादी ग्रामोद्योग, घरे, पिण्याचे पाणी, जळण आणि चारा, दळणवळणाची साधने, रस्ते,
पूल, फेरीबोट, जलमार्ग इ. विद्युतीकरण, दारिद्रय निर्मूलन, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, प्रौढशिक्षण व अनौपचारिक शिक्षण,
तंत्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन,
ग्रंथालय, आरोग्य व स्वच्छता- ग्रामीण आरोग्य केंद्र, दवाखाना व रुग्णालय, कुटुंबकल्याण, महिला व बालकल्याण, समाज संपत्तीचे संरक्षण, आर्थिक-सांस्कृतिक कल्याण, अनुसूचित जाती-जमातीसाठी कामे, अपंग व
मतिमंदाकडे विशेष लक्ष पुरवणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था, बाजार आणि जत्रांची कामे इ.
ग्रामसूची किंवा अनुसूची 1 -
ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ अन्वये पंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये निश्चित करून दिलेली आहेत.
या कलमाच्या अनुषंगाने ग्रामसूची किंवा अनुसूची- १ मध्ये वेगवेगळ्या १२ विभागांच्या संबंधी ७८ विषयांची जबाबदारी ग्रामपंचायातीकडे
सोपविण्यात आली आहे.
अनुसूची १ मध्ये नमूद केलेले विभाग आणि त्याअंतर्गत विषयांची संख्या याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :
[विभाग आणि त्या अंतर्गत
विषयांची संख्या ]
१. कृषि ११
२. पशुसंवर्धन ०१
३. वने ०१
४. समाजकल्याण ०३
५. शिक्षण ०५
६. वैद्यकीय आणि आरोग्य १६
७. इमारती व दळणवळण ०८
८. पाटबंधारे ०१
९. उद्योगधंदे व कुटीर उदयोग ०१
१०. सहकार ०२
११. स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण ०४
१२. सामान्य प्रशासन २५
८. ग्रामपंचायतीला कर आणि फी आकारण्याचे अधिकार आणि ग्रामपंचायतीचा निधी :- ग्रामपंचायती ह्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. नागरी भागामध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचेवर स्थानिक कामाची जबाबदारी असते तीच
जबाबदारी ग्रामीण भागामध्ये
ग्रामपंचायतीवर आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाकरीता उत्पन्न वाढावे म्हणून कर व फी आकारण्याचे अधिकार शासन ग्रामपंचायतीना देईन तसेच शासनाने
आकारलेल्या कर, फी इत्यादी उत्पन्नामधून मिळालेली रक्कम शासन ग्रामपंचायतीना देईल. त्याशिवाय राज्याच्या आकस्मित निधीतूनही पंचायतींना अनुदान मिळेल.
ग्रामपंचायतीला फी, अनुदाने इ.
द्वारा मिळणारे उत्पन्न एकत्र
ठेवण्याकरीता निधी निर्माण करण्याचे
आणि कायदेशीर कामाकरिता खर्च करण्याचे अधिकार शासन ग्रामपंचायतीना देईन अशी तरतूद घटना दुरुस्ती मध्ये करण्यात
आलेली आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १२४ अन्वये
ग्रामपंचायतीना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध कर बसविणे आणि ते वसूल करण्याचे अधिकार आहेत. प्रचलित करांमध्ये मालमत्ता कर [घरपट्टी] हे पंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्याचबरोबर जमीन सुधार कर,
खाजगी पाणीपट्टी [नळयोजना असल्यास] सक्तीचे आहेत. शासन निर्णय दिनांक ३ डिसेंबर १९९९ नुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता कराची [घरपट्टीची] आकारणी थेट
क्षेत्रफळावर आधारित केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होत आहे.
ग्रामपंचायत करांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य कर, दिवाबत्ती कर यांचा समावेश आहे. परंतु त्याचबरोबर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने करांची वसुली जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. वसूलीचे प्रमाण वाढण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी परिणामकारक
विनियोग होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे.
९. ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीचे
अवलोकन करण्यासाठी वित्त
आयोगाची निर्मिती ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचे समीक्षण करण्यासाठी राज्य पातळीवर एका वित्त आयोगाची नियुक्ती करण्यासंबंधी तरतूद केलेली आहे.
राज्य वित्त आयोग -
राज्याचा राज्यपाल दर पाच
वर्षांनी अशा वित्त आयोगाची नियुक्ती करेल हा वित्त आयोग राज्य आणि पंचायत राज्य संस्था यांच्यात
कराच्या उत्पन्नाची विभागणी कशी करावी, पंचायतींना कोणते कर बसविण्याचा अधिकार दयावा, तसेच राज्याच्या संचित निधी मधून पंचायत राज्य संस्थांना कसे अनुदान दयावे
यासंबंधीची तत्वे ठरवून देईल.
त्यानुसार वित्त आयोग पंचायती राज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करून पुढील बाबीसंबंधी राज्यपालाकडे शिफारस करील.
अ]
१. राज्यशासनाने जमा केलेल्या करापैकी पंचायती राज्य संस्थांना किती हिस्सा दयावा या संबंधी शिफारस.
२. पंचायतीराज संस्था कोणत्या प्रकारचे कर आकारू शकतील तसेच
असलेले के वाढवू शकतील यासंबंधी शिफारस.
३. राज्य सरकार आकस्मिक फंडातून
पंचायती राज्य संस्थांना किती रक्कम
देऊ शकेल यासंबंधी शिफारस.
ब. पंचायती राज्य संस्थांची आर्थिक
स्थिती सुधारण्याच्या उपयासंबंधी
शिफारस.
क. पंचायतीराज संस्था आर्थिक
दृष्ट्या बळकट करण्यासाठी राज्यपालांनी वित्त आयोगाकडे
सोपविलेल्या विषयासंबंधी शिफारस.
राज्याचे कायदे मंडळ कायदा करून वित्त आयोगाची रचना, त्यांच्या सभासदाच्या निवडीची पद्धत
इत्यादी गोष्टी संबंधी निर्णय घेईल. शासन ही सर्वोच्च संस्था असल्यामुळे
कोणत्या समितीच्या अहवालातील
कोणत्या शिफारशी स्वीकाराव्या आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची याचा शासनास पूर्ण अधिकार आहे. वित्त आयोग हा घटनात्मक तरतूदीनुसार स्थापन होत असल्यामुळे त्याचे महत्त्व अन्य सामित्यांपेक्षा वेगळे आहे. वित्त
आयोगाचा अहवाल प्रसिध्द करण्यापूर्वी तो विधी मंडळास सादर करणे आणि आयोगाच्या शिफारशीची चर्चा करणे आवश्यक असते. आयोगाच्या अहवालास अन्य
समित्यांच्या अह्वालापेक्षा अधिक महत्त्व आहे.
शासनाने सन १९९४ मध्ये नियुक्त
केलेल्या पहिल्या वित्त आयोगाचा अहवाल जानेवारी १९९७ मध्ये आयोगाने शासनास सदर केला होता. दुसऱ्या राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल मार्च २००२ मध्ये शासनास सदर केला आहे. या आयोगाच्या अहवालावर शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे. आयोगाच्या अहवालातील शिफारशीचा अभ्यास पंचायत संस्थांमधील लोकप्रतीनिधीनी करून त्या मधील ज्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला पाहिजे. विशेषतः आर्थिक
शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी अधिक पाठपुरावा करण्याची गरज आहे.
१०. हिशेब तपासणी
राज्यशासन पंचायतीराज संस्थांचे हिशेब तपासण्यासाठी कायदा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४० मध्ये ग्रामपंचायतीच्या लेख्यांची तपासणी करण्याची तरतूद
करण्यात आलेली आहे. लेख्यांची तपासणी करण्यापूर्वी किमान सात
दिवस आधी नोटीस दिली जाते. लेख
परीक्षकाने कोणते मुद्दे काढलेले आहेत, ते सरपंच आणि सचिव यांनी माहिती करून घेणे आवश्यक
आहेत. लेखा परीक्षक/ हिशोब
तपासणीसाच्या रिपोर्टमधील काही मुद्दे जागीच निकालात काढणे शक्य असल्यास तपासणीसाबरोबर चर्चा करून ते निकाली काढावेत. तपासणी अंती चर्चा केल्यानंतर जे मुद्दे शिल्लक
राहतील त्याचा लेखा परीक्षण अहवाल सरपंच, गटविकास अधिकारी, पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे पाठविण्यात येतो.
लेख परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंचायतीने लेखापरीक्षण टिप्पणी मध्ये दाखविलेले दोष दुर केले पाहिजेत व ३ महिन्याच्या आत कार्यवाही पंचायत समितीस कळविले पाहिजे व मासिक सभेपुढे ठेवले पाहिजे. कलम ७ नुसार सरपंचाने
ग्रामसभा बोलावणे आवश्यक आहे. कलम ८ नुसार लेखापरीक्षण अहवाल व त्याला दिलेली उत्तरे ही पहिल्या ग्रामसभेच्या बैठकीमध्ये
ठेवली पाहिजेत.
वाटचाल – ग्रामपंचायती स्वावलंबी होऊन त्यांना स्वायत्त संस्थांमध्ये आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्र शासनाने ७३ वी घटना दुरुस्ती केली. त्यामुळे ग्रामपंचायतीना घटनात्मक दर्जा प्राप्त
झाला आहे. महाराष्ट्र शासनानेही १९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात बदल केले आहेत आणि यापुढेही आवश्यक ते बदल केले जातील अशा तऱ्हेने ग्रामपंचायतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरु झाली आहे, व गेल्या १४ वर्षामध्ये पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे तरीसुद्धा अजून फार मोठा पल्ला गाठावयाचा आहे.
▪ जेवढी टाईप करणं झाली तेवढी माहिती इथे देण्याचा प्रयत्न केला आहे, अजुनहि जसा वेळ भेटेल तशी माझ्या नोट्स मधिल थोडीथोडी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Thursday, February 5, 2015

CSAT ची तयारी कशी करावी ?

#‎सीसॅट_परीक्षेची_तयारी‬
’स्कील, स्केल व स्पीड (Skill, Scale & Speed ) ’ या तीन
शब्दांद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय
प्रशासनाला गतिमानता देण्यासाठी जी व्यूहरचना आखलेली आहे,
तिचा मूळ आधार म्हणजे भारतीय प्रशासनाची प्रचंड ताकद.
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आर्थिक व सामाजिक
परिवर्तनाला दिशा देताना प्रशासनाची भूमिका नेहमीच
मध्यवर्ती राहिली आहे. त्यातही गेल्या 20 वर्षाच्या आर्थिक
सुधारणांच्या काळात झालेल्या परिवर्तनाच्या बर्या्वाईट
परिणामाशी जुळवून घेताना खंबीर प्रशासकीय नेतृत्वाचा कस
लागलेला आहे. असे खंबीर नेतृत्व फक्त लोकनेत्यांचे असून चालत नाही,
तर तितकेच खंबीर किंवा त्यापेक्षा जास्त कार्यक्षम असे प्रशासकीय
अधिकार्यां चे नेतृत्व आवश्यक असते. 2022
साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने
मोदी सरकारने व्हिजन 2022 अंतर्गत देशातील 75
कोटी तरुणाईला सक्षम करण्यासाठी जी काही व्यूहरचना आखण्याचे
ठरविले आहे त्यात वरील तीन शब्दांना मध्यवर्ती स्थान आहे. त्यामुळे
स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात करिअर करू
इच्छिणार्या् तरुणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना या पैलूकडे
लक्ष दिले पाहिजे.

* स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये
( capacities & skills) -
गेल्या 3 वर्षापासून युपीएससी, एमपीएससी किंवा इतर आयोगाद्वारे
परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमात जो बदल करण्यात आलेला आहे,
त्याचा नेमका उद्देशच अशाप्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे उमेदवार
निवडणे हा आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून यशस्वी व्हायचे असेल
तर उमेदवाराला स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना पुढील
क्षमता वृद्धीवर भर देणे आवश्यक आहे -
1) परिस्थितीची आकलन करण्याची क्षमता
2) विश्लेिषण क्षमता
3) निर्णय क्षमता
4) संवाद कौशल्य
5) सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता
व्यक्तिमत्त्वात वरील क्षमतांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना
काही कौशल्ये त्यांच्यात जाणीवपूर्वक विकसित करावी लागतात.
ही कौशल्य कोणती असावीत, याबाबत आत्तापर्यंत कोठारी कमिशन,
सतिशचंद्र आयोग, वाय. के. अलघ आयोग,
विराप्पा मोईली प्रशासकीय आयोग, एस. के. खन्ना समिती, डॉ. अरुण
निगवेकर समिती, यासारख्या तज्ज्ञ समित्यांनी वारंवार
शिफारशी केल्या आहेत. या सर्व शिफारशींचा रोख पाहता सद्यस्थितीत
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर उमेदवाराला पुढील कौशल्ये
विकसित करणे नुसते आवश्यकच नसून अनिवार्यसुद्धा आहे -
1) ज्ञान/सामग्री संकलन
2) आकलन व अभिवृत्ती
3) अंदाज बांधण्याची कुवत
स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराकडे असलेले ज्ञान
किंवा सामग्री तपासण्यासाठी विहित अभ्यासक्रमावर जे काही प्रश्न्
विचारले जातात त्यांचे एकूण प्रश्ना तील प्रमाण सुमारे 50 टक्के
असते. आकलन-अभिवृत्ती क्षमता तपासणार्या् प्रश्नां चे प्रमाण 35
टक्के असते, तर अंदाज बांधण्याची कुवत तपासणार्याअ प्रश्नां्चे
प्रमाण 15 टक्के पर्यंत असते. त्यामुळे
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना निव्वळ अभ्यास (वाचन-मनन-चिंतन)
करून चालत नाही तर विविध प्रकारच्या क्षमता व कौशल्ये विकसित
करावी लागतात.
* अभिवृत्ती (Aptitude) -
प्रशासकीय क्षेत्रामध्ये
भरती करण्यासाठी घेतल्या जाणार्या परीक्षांचा रोख
हा उमेदवाराची अभिवृत्ती (Aptitude) तपासण्याचा असतो.
ही अभिवृत्ती म्हणजे एखाद्या उमेदवाराकडे त्याची निवड झाल्यानंतर
अधिकारीपदासाठी जे प्रशिक्षण दिले जाते ते प्रशिक्षण सक्षमपणे
घेण्याची कुवत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्याद
उमेदवारासाठी अॅाप्टीट्यूड म्हणजे "The capacity to perform a
given task with available resources to achieve a
set target in a given time frame " ‘ थोडक्यात,
एखाद्या उमेदवाराकडे प्राप्त स्थितीत उपलब्ध साधनांच्या सहाय्याने
दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची क्षमता आहे की नाही हे तपासणे
म्हणजे त्याची अभिवृत्ती तपासणे.
2011 पासून युपीएससीने, तर 2012 पासून एमपीएससीने
अशा प्रकारच्या अभिवृत्ती चाचणीचा पूर्व परीक्षेत समावेश केला आहे.
तसेच 2013 पासून युपीएससीने मुख्य परीक्षेमध्येसुद्धा 250
गुणांसाठी अशाप्रकारच्या अभिवृत्ती चाचणीचा 1 पेपर समाविष्ट
केलेला आहे. अभिवृत्ती चाचणीचा मूळ उद्देश
एखाद्या उमेदवाराची विचार करण्याची कुवत
आणि ओरिजिनॅलिटी तपासणे हा आहे. त्यामुळे
या परीक्षांची तयारी करताना उमेदवाराने आपल्यामध्ये प्रशासकीय
अभिवृत्ती कशी विकसित होईल याकडेच लक्ष देणे आवश्यक ठरते.
ही अभिवृत्ती पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही पातळ्यावर
तपासली जाते.
* पर्याप्त व शाश्ववत अभ्यास (Optimum & Sustainable
Study) -
स्पर्धा परीक्षेचा यशाभिमुख अभ्यास हा नेहमीच उमेदवाराच्या उपजत
गुणाना चालना देणारा असतो. एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण
होण्यासाठी आवश्यक व पुरेसा अभ्यास म्हणजे पर्याप्त अभ्यास, तर
आज केलेला अभ्यास फक्त एकच परीक्षा पास होण्यासाठी नाही तर
विविध परीक्षा पास होण्याबरोबरच,अधिकारी म्हणून कार्यरत
असतानाही उपयुक्त ठरला तर तो शाश्वहत अभ्यास !
येथे अभ्यासाची उत्पादकता महत्त्वाची आहे. अभ्यास ही गुंतवणूक
समजून त्याद्वारे सतत परतावा मिळालाच पाहिजे, असे नियोजन हवे.
एकदा केलेला अभ्यास अनेक परीक्षा पास होण्यासाठी उपयोगी पडलाच
पाहिजे, म्हणून अभ्यास किती केला त्यापेक्षा कसा याकडे लक्ष द्यावे.
अभ्यासाची उत्पादकता ही वर्षात, महिन्यात, दिवसात
मोजण्यापेक्षा ती प्रतितास मोजली पाहिजे. 1 तास केलेला अभ्यास
हा किमान 1 गुण मिळविण्यासाठी उपयुक्त पडलाच पाहिजे हे लक्षात
घेऊन त्यात सातत्य ठेवण्यासाठी उजळण्या कराव्यात.
* 2015 च्या सीसॅटची तयारी -
पूर्व परीक्षेसाठी आलेल्या 400
गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी करावयाची असेल तर प्रतिदिन सुमारे 6
ते 7 गुणांची तयारी करावी लागते.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करावयाची असेल तर
त्या परीक्षेसाठी असलेल्या एकूण गुणांची संख्या लक्षात घेऊन
प्रत्येक गुणासाठी 1 तासाचा अभ्यास याप्रमाणे नियोजन केल्यास सदर
परीक्षेसाठी उमेदवाराची किमान स्तरावरची तयारी होऊ शकते.
काही उमेदवारांना कदाचित यापेक्षा जास्त अभ्यास करावयाची गरज
असू शकते, पण अभ्यासाची किमान पातळी मात्र संबंधित
तासापेक्षा कमी असून चालत नाही. उदा. युपीएससी सीसॅट
परीक्षेसाठी एकूण 400 गुण आहेत. म्हणजेच
या परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही उमेदवाराने किमान 400
तासांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. या 400 तासांचे नियोजन
करताना प्रतिदिन किमान 10 तास अभ्यास केल्यास 40 दिवस लागू
शकतात आणि किमान 4 तास प्रतिदिन अभ्यास केल्यास 100 दिवस
लागू शकतात. थोडक्यात, या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी किमान
40 ते कमाल 100 दिवस पुरेसे ठरू शकतात. अर्थात
उमेदवाराच्या कुवतीनुसार आणि आकलन क्षमतेनुसार यात बदल
करता येतो.
गेल्या काही वर्षात पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील
उमेदवारासाठी 400 पैकी किमान 250 गुणांचे मानक युपीएससीसाठी, तर
एमपीएससीसाठी किमान 150 गुणांचे मानक आवश्यक बनले आहे.
2015 च्या परीक्षेतसुद्धा हाच कल राहण्याची शक्यता असल्याने
प्रत्येक उमेदवाराचे 5 एप्रिल पर्यंतच्या अभ्यासाचे उद्दिष्ट हे 400
पैकी 250 गुण मिळविणे हेच असले पाहिजे.
* सामान्य अध्ययन पेपर 2 ची तयारी -
काही उमेदवारांच्या अनुभवावरून पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हावयाचे असले
तर या परीक्षेतील पेपर 2 मध्ये चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे.
पेपर 2 मधील असलेल्या एकूण 7 घटकांची तयारी करताना त्याचे तीन
गटात वर्गीकरण करावे.
पहिला गट हा आकलनाचा, ज्यात सर्वसाधारण आकलन
आणि इंग्रजी भाषेचे आकलन यावर मिळून सुमारे 40 प्रश्नर म्हणजेच
परीक्षेतील निम्मा भर असतो. ज्यांची आकलन
घटकाची तयारी चांगली असते त्यांना या 40 पैकी 35 पेक्षा जास्त
प्रश्नांनची उत्तरे काढता आल्यास त्यांना किमान 85 पेक्षा जास्त गुण
येथेच मिळू शकतात.
दुसरा गट म्हणजे निर्णयक्षमता+समस्या निराकरण, संवाद कौशल्य
+अंतरव्यक्तीगत कौशल्य या अभ्यासघटकांचा. आत्तापर्यंत सदर
घटकावर 7 ते 8 प्रश्नि विचारले गेले आहेत. या प्रश्नांकना निगेटिव्ह
मार्किंग नसल्याने येथे थोड्याफार सरावाने येथे पैकीच्या पैकी म्हणजे
20 गुण मिळू शकतात.
उर्वरित तिसरा घटक म्हणजे तर्कसंगत विश्लेतषण + बुद्धिमापन
चाचणी + अंकज्ञान. या तीनही घटकावर मिळून दरवर्षी सुमारे 30 भर
प्रश्नि विचारले जातात. यामध्ये 20 प्रश्नां ची उत्तरे आल्यास
उमेदवारास 50 गुण मिळू शकतात.
अशारीतीने सरासरी अभ्यास केल्यास पेपर 2 मध्ये 85 + 20 + 50 =
150 पर्यंत गुण मिळू शकतात. येथे एक लक्षात घेतले पाहिजे
की या पेपरची तयारी म्हणजे निव्वळ सराव आणि सराव असेच
असल्याने विविध नमुना प्रश्न पत्रिका वेळ लावून 2 तासात
सोडविण्याची प्रॅक्टिस अनिवार्य आहे. त्यातही दररोज एका तासामध्ये
12 ते 15 उतार्याघवरील 40 प्रश्नी सोडविण्याचा सराव करणे, तसेच
अर्ध्या तासामध्ये गणित, बुद्धिमापन आणि तर्कक्षमतेच्या 30
प्रश्नां ची उत्तरे शोधण्याचा सराव करणे फार महत्त्वाचे आहे.
आकलन घटकाला जास्त महत्त्व असल्याने उमेदवाराची वाचन
क्षमता खूपच प्रगल्भ असणे आवश्यक आहे. येथे वाचण्याचा वेग
वाढविण्याबरोबरच संबंधित उतार्या्मध्ये
नेमका कोणता मध्यवर्ती मुद्दा आहे ते समजून घेऊन त्यावरील
प्रश्नां ची उत्तरे शोधण्याचा सराव सतत करणे आवश्यक आहे.
परीक्षेपर्यंत सुमारे 500 उतारे अशाप्रकारे सरावासाठी वापरले तर
आकलन क्षमतेवरील बहुतेक सर्व प्रश्नांआची उत्तरे शोधणे सोपे जाऊ
शकते.
अंकगणित, बुद्धिमापन, तर्कक्षमता घटकाचा अभ्यासक्रम खूपच
विस्तृत असल्याने त्यावर सुमारे वेगवेगळ्या 50 प्रकारचे प्रश्ने
विचारले जातात ते युपीएससीच्या गेल्या 3 व एमपीएससीच्या 2
पेपरवरून लक्षात येते. त्यामुळे असे 50 प्रकार लक्षात घेऊन
त्याबाबतच्या क्लृप्त्या जाणून घेतल्या तर हे प्रश्नए
सोडविण्यासाठी 30 सेकंद पुरेसे ठरू शकतात.
निर्णयक्षमता, समस्या निराकरण या घटकावरील प्रश्न
सोडवताना सध्याच्या प्रशासनाचा जो मुख्य उद्देश आहे - सर्व
समावेशकता, सामाजिक पुढाकार, सामाजिक न्याय, प्रशासकीय
नियमांची चौकट, सर्वांना बरोबर घेऊन जायचा दृष्टिकोन, या सर्व
बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
* सामान्य अध्ययन पेपर 1 ची तयारी व संदर्भ साहित्य-
सामान्य अध्ययन पेपर 1 ची तयारी करताना मूलभूत साहित्य म्हणून 8
वी ते 10
वी च्या एनसीईआरटीच्या युपीएससीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित
असलेली इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण,
सामान्यविज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संख्याशास्त्र,
या विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यास
आपल्याला पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकते. पण
या माहितीच्या आधारे आपण परीक्षेत येणार्याअ 100 पैकी 50
प्रश्नां चीच उत्तरे शोधू शकतो. उर्वरित 50 प्रश्नां ची उत्तरे
शोधण्यासाठी केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण विभागामार्फत
प्रकाशित होणार्याक पुढील साहित्याचा वापर करावा लागतो -
इंडिया 2015, योजना, कुरुक्षेत्र,www.vikaspedia वरील माहिती,
शासनाच्या विविध खात्यांची परिपत्रके. याशिवाय ‘द हिंदू‘, फ्रंटलाईन,
मेनस्ट्रीम, इकॉनॉमिक पॉलिटिकल विकली, द इकॉनॉमिस्ट, इंडिया टुडे,
टाइम यासारख्या वृत्तपत्रातून प्रकाशित
झालेल्या महत्त्वाच्या बातम्या परीक्षेतील प्रश्नांुची उत्तरे
शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच युपीएससीच्या वेबसाइटवर
2011 पासून 2015 पर्यंत झालेल्या विविध परीक्षांचे पेपर्स प्रकाशित
करण्यात आले आहेत त्यातील पुढील परीक्षांचे पेपर
नागरी सेवा परीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी उपयुक्त ठरू शकतात -
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस, नॅशनल
डिफेन्स अकादमी, कम्बाईंड मेडिकल सर्व्हिसेस, इंडियन इकॉनॉमिक
आणि स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस, इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस, सेंट्रल
पोलीस ऑर्गनायझेशन एसीपी भरती परीक्षा, इत्यादी.
सध्या विविध खाजगी प्रकाशन आणि क्लासेसद्वारे प्रकाशित होणार्यार
मासिकांचा आणि वेबसाइटचा परीक्षेच्या तयारीसाठी आधार घेता येऊ
शकतो. ही मासिके, ब्लॉग्ज आणि वेबसाईटस पुढीलप्रमाणे -
www.thecalibre, सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल, विझार्ड, केंद्रीय
स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ मासिक.
लेख आवडल्यास नक्की शेअर करा …

क्रांतीवीर नाना पाटील(Krantiveer Nana Patil) एमपीएससी मुख्यपरीक्षा


क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.
क्रांतिसिंह नाना पाटील
Krantisinh-nana-patil.jpg
क्रांतिसिंह नाना पाटील
जन्म: ऑगस्ट ३, इ.स. १९००
बहेबोरगाव, पुणे सांगली, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: डिसेंबर ६, इ.स. १९७६ वाळवा येथे
वाळवा
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म: हिंदू

जीवन

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.नाना पाटील याना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
क्रांतिसिंह नाना पाटील गाव सांगली जिल्ह्यातील येङमचछिद हे आहे.

स्वातंत्र्य लढा

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत.आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.मला वाळव्यामधेच दहन करन्यात यावे ही त्याची इछा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करन्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळ

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त ’दैनिक पुढारी’मधील चित्रमय जीवनवेध…
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.[१]

संबंधित साहित्य

  • क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
  • सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
  • क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
  • क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
  • पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
 स्त्रोत: मराठी विश्वकोश

Wednesday, February 4, 2015

अण्णा भाऊ साठे(annbhau sathe)एमपीएससी मुख्यपरीक्षा

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [ संदर्भ हवा ]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते.अण्णा भाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.

जीवन

ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसर्‍या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत. लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.

क्रांतिकारक लेखक-कवी

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले. इ.स.१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्याय लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला.
अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्य

अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या

‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणार्‍या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्‍या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.

अण्णा भाऊंच्या कथा

अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले.
  • ‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.
  • ‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.
  • ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.
  • ‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोर्‍यामार्‍या करणार्‍या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.
  • ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात
  • ‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.
  • ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.
  • ‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.
  • ‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.
  • ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.

अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तके

  • अण्णा भाऊ साठे (चरित्र लेखक - बाबूराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)
  • माझा भाऊ अण्णा भाऊ (चरित्र - लेखक - शंकर साठे)
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (चरित्र - डॉ. भगवान कौठेकर)
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय (प्रकाशक -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
  • कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्‍या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.
  • कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जाति‍अंताचा लढा’ हा लेख आला होता.

साहित्य संमेलने

  • अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक साहित्य संमेलने होतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात. उदा० अण्णा भाऊ साहित्य संमेलन, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन किंवा साहित्यिक अण्णा भाऊ साहित्य संमेलन वगैरे वगैरे.

पुरस्कार

  • १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
 स्त्रोत:विकिपीडिया

विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar savarkar) एमपीएससी मुख्यपरीक्षा

(२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरविनायक दामोदर सावरकरम्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.

८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद  ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी  ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.

मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.

ल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा  ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.

लंडनमध्ये असताना विहारी   आणि काळ  ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).

ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची  आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.

८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला; पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन  ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.

लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले सेनापती बापट  ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.

ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर  ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा   ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा  ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.

सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली; त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).

सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला  हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल   ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.

९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी; मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप  (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.

स्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.

सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते; दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.
सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.

सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.

अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला; तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.

दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली; तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी; तसे घडले.

भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.

त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते; तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व  ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.

सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले  (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला  हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता  (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप  ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी  (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात  (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने   ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात  हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे   ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी  (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप  (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स   आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय  (खंड १ ते ८, १९६३–६५) ह्यात समाविष्ट आहे.

मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्या अखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.

संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.
     २. कीर, धनंजय; अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.
     ३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे,  १९७०.
     ४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.
    ५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.
     ६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

कुलकर्णी, अ. र.
 स्त्रोत: मराठी विश्वकोश